top of page

नवीन आवृत्ती - श्रीमद् भागवत रहस्य

श्रीमद् भागवत रहस्य

रचना - प. पू. रामचंद्रशास्त्री डोंगरेमहाराज

अनुवाद - स. ना. तथा अप्पासाहेब महाजन

नवीन ​आवृत्ती

एकूण पृष्ठे- ६१६
किंमत- ₹ ६००/-

Aaple Mahabharat Cover.jpg

महाभारत हा केवळ आपलाच नव्हे तर संपूर्ण जगाचाच मार्गदर्शक ग्रंथ म्हणावा लागेल. मानवाच्या इतिहासात, जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणारा, महाभारताएवढा दुसरा ग्रंथ नाही. अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, राजकारण, समाजकारण, धर्मविचार, आध्यात्म, कथासाहित्य इत्यादींचा हा ग्रंथ म्हणजे एक विशाल ज्ञानकोश असून आजच्या कित्येक समस्या सोडविण्यासाठी त्याचा उपयोग होण्यासारखा आहे.
संस्कृत महाभारताचा हा जशाचा तसा अनुवाद नाही, भाषांतर तर नाहीच नाही. व्यास महर्षींच्या भव्य व अगाध प्रज्ञेचे एतिहासिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्टीकोनातून दर्शन घडविण्याचा हा एक अभिनव प्रयत्न आहे. भूतकाळाचा मागोवा घेऊन वर्तमानकाळ घडविण्याचा हा एक अभिनव असा प्रयोग आहे. येथे महाभारतातील व्यक्तींच्या विचारांचे, विविध घटनांचे वर्तमान काळाच्या संदर्भात काय स्थान आहे, याचा विचार केला आहे. म्हणून प्राचार्य दसनूरकर यांच्या महाभारतात सर्वसामान्य माणसाच्या संघर्षमय जीवनाचे हुंकार पानोपानी दिसतात.
महाभारताच्या कथेमध्ये व्यासांनी अनेक महान व्यक्तीरेखा अजरामर केल्या आहेत. त्या दैवी वाटतात, नियतीच्या क्रूर खेळाचा एक भाग वाटतात, पण त्या व्यक्तीरेखा आपल्याला आपल्यासारख्याच हाडामासांच्या सर्वसामान्य माणसांच्या वाटतात. त्यांची सुखदुःखे आपल्यासारखीच आहेत याची जाणीव आपल्याला सतत करून देतात. म्हणून महाभारत अतिमानवी भासत नाही तर ते "आपले" वाटते, अन् म्हणून ते जनमानसात खोलवर रुजले आहे. थोडक्यात सांगायचे तर "आपले महाभारत" हा ग्रंथ भारतीय मनाला आधार देणारा दीपस्तंभच आहे !

आपले महाभारत

ग्रंथ कोल्हापूरमध्ये उपलब्ध...

महाराष्ट्र ग्रंथ भांडार

प्रकाशक व पुस्तक विक्रेते

सुमारे ८५ वर्षांपूर्वी १९३६ च्या रथसप्तमीला श्री. गोविंद वामन तथा दादा कुलकर्णी यांनी कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र ग्रंथ भांडार हे पहिले पुस्तकाचे दुकान सुरू केले. समाजधुरीण आचार्य स.ज. भागवत, आचार्य शंकरराव देव, आचार्य जावडेकर यांच्या निकटच्या सान्निध्यामुळे दादांनी  समाजहित डोळ्यासमोर ठेवून केवळ ज्ञान देण्यासाठीच हा व्यवसाय सुरू केला. सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला या प्रबोधनात्मक प्रकाशन संस्थेचे काम दादा त्यावेळी सांभाळत होते. त्याच प्रेरणेतून महाराष्ट्र ग्रंथ भांडार हे प्रकाशनही त्यांनी सुरू केले, आणि प्रबोधनात्मक संस्कारक्षम पुस्तके प्रकाशित करून समाज बांधणीतील आपला मोलाचा वाटा उचलला. समाजातील लहानातल्या लहान घटकांपर्यंत पोहोचून, त्याला ज्ञानार्जनाची गोडी लावण्यासाठी अनेक विषय साधेसोपे करून पुस्तकरूपाने सिद्ध केले. दादा कुलकर्णी यांनी केलेल्या मौलिक प्रकाशनात खालील प्रमुख पुस्तकांचा समावेश आहे- डॉक्टर गोविंद केशव भट यांची अभिजात संस्कृत साहित्यावरील पुस्तके, श्री. गजानन बाळकृष्ण दंडगे शास्त्री यांनी सोपे केलेले संस्कृतमधील जुने दुर्मिळ साहित्य, ह्रषिकेश येथील स्वामी शिवानंद सरस्वती यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकांचे श्री. भ. रा. नाईक यांनी केलेले मराठी अनुवाद- उदाहरणार्थ, यशस्वी जीवन, विचार सामर्थ्य, आपली संस्कृती, स्पर्श आनंदाचा, श्री. ना.वा. गुणाजी यांचे समग्र स्वामी रामतीर्थ, श्री. हरि दत्तात्रय अकिवाटकर यांचे श्रीभागवत भक्तीकथासागर, कुसुमताई आणि वसंतराव नारगोळकर या तत्त्वनिष्ठ दांपत्याने आदिवासी वारली समाजात राहून शब्दबद्ध केलेले अनुभव, जंगलचे राजे, पंडित गोविंदराव टेंबे यांची संगीत विषयक, जीवन व्यासंग आणि कल्पना संगीत ही पुस्तके, माननीय दादासाहेब मावळंकर यांची 'काही पावले' या नावाने दोन खंडातील दैनंदिनी, कथा-कादंबरी या ललित साहित्य प्रकारात पुढे आघाडीचे नाव कमावलेल्या डॉक्टर सुमति क्षेत्रमाडे, मालतीबाई दांडेकर यांची पहिली काही पुस्तके प्रकाशित करून दादा कुलकर्णी यांनी त्यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचे बीजारोपण केले महात्मा गांधी यांचे 'विद्यार्थ्यांशी हितगूज', पंडित जवाहरलाल नेहरू यांचे 'आव्हान' अशी काही अभिमानास्पद प्रकाशने त्यांच्या नावावर आहेत. 
मौनी विद्यापीठ गारगोटी येथील प्राचार्य द. गो. दसनूरकर यांनी लिहिलेला दहा खंडातील 'आपले महाभारत' हा महाग्रंथ दादांच्या प्रकाशन कारकिर्दीतील मेरूमणी ठरला. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, तर्कशास्त्र या विषयांचे अभ्यासू प्राध्यापक शशिकान्त कुलकर्णी यांनी हा व्यवसाय हाताळताना, शैक्षणिक मूल्य आणि समाजहिताची भावना कायम राखत एक नवीन आयाम गाठला. त्यांनी प्रकाशित केलेल्या अनेक ललित पुस्तकांना राज्य पुरस्कारासह अनेक मान्यवर पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राजर्षी शाहू छत्रपती यांचा 'स्मृतिग्रंथ' हे त्यांचे एक महत्त्वाचे प्रकाशन. परमपूज्य डोंगरे महाराज यांनी गुजराथीमध्ये दिलेल्या प्रवचनांचा, माननीय आप्पासाहेब महाजन यांनी हिंदीतून मराठीत केलेला श्रीमद्भागवत रहस्य हा ग्रंथ या प्रकाशनाचा एक महत्त्वाचा ऐवज ठरला आहे. 'श्रीमद्भागवत रहस्य' या ग्रंथाचे सव्विसावे पुनर्मुद्रण सध्या सुरू आहे. महाराष्ट्र ग्रंथ भांडार हे पुस्तक प्रकाशनासोबत पुस्तक विक्रीचेही एक अग्रगण्य ठिकाण  बनलेले आहे. पुस्तक प्रकाशन आणि विक्री हे व्यवसाय न मानता, ही एक सामाजिक जबाबदारी आणि समाजसेवा हीच भावना मनामध्ये बाळगून ८५ वर्षांच्याही पुढे ही वाटचाल अखंड सुरु राहणार आहे......

bottom of page